
आंबे भरपुर खा पण…
आंबे खाण्याचा मोसम आहे सध्या. मार्च महिन्याच्या मध्यानंतर साधारण पणे आंब्यांचा सीझन सुरु होतो. आंबे पिकणे किंवा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणे यामध्ये एक ढोबळ नियम आहे. आधी दक्षिणे कडील आंबे पिकतात आणि त्यांनंतर उत्तरेकडील आंबे पिकु लागतात. म्हणजे कर्नाटकचा आंबा सर्वात आधी पिकतो आणि त्यानंतर कोकण आणि मग गुजरात असा क्रम असतो आंबे पिकण्याचा.
त्यामुळे शहरातील लोकांना आंबे साधारण पणे दोन ते अडीच महिने खाण्यासाठी मिळतात. शहरातील लोकांना मिळतात याचे कारण की शहरात बाजारपेठा असतात व व्यापारी असा विविध ठिकाणचा आंबा जसा पिकेल तसा बाजारात आणुन विकतात.. आंबा जर आपल्याच भागातुन बाजारामध्ये विक्रीसाठी आलेला नसेल म्हणजे दुस-या भागातुन आलेला असेल तर त्याचा भाव जास्त असतो. व जस जसे त्या त्या भागातील आंबा पिकण्यास सुरुवात होते तस तसे मग आंब्याची आवक वाढते आणि किंमत आवाक्यात येते.
आणि या बाजारपेठांमुळेच आंबे आपणास अगदी दोन ते अडीच महिने खाण्यासाठी उपलब्ध असतात. पुर्वी आंबे त्या त्या भागातील सीझन नुसार मिळायचे. म्हणजे पुणे शहराच्या बाजारपेठेला आंबा आजुबाजुच्या तालुक्यातील आंबे पिकल्यानंतरच मिळायचे.
हल्ली हापुस आंब्याची फारच चलती आहे. चलती म्हणायचे कारण असे की ग्राहकाला द्र्श्य स्वरुपात आणि अनुभव स्वरुपात सतत सतत “हापुसच चांगला” असे अनेक दशके नाना प्रकारे सांगुन सांगुन तयार झालेली हापुसची बाजारपेठ सध्या खुप मोठा व्यवसाय करते आहे.
पण खरच हापुस आंब्याशिवाय इतर कोणताही आंबा हापुस इतका चांगला नसतो का? हे आपण समजुन घेऊच. त्याआधी आपण आंब्यामध्ये कोणकोणती पोषक तत्वे असतात हे पाहुयात.
आंब्यामध्ये जीवनसत्व ए, बी, सी, इ आणि के असतात. बी जीवनसत्व आपल्या शरिरात साठवून ठेवले जात असल्याने, सिझनमधे खालेल्या आंब्यापासून त्याची साठवण शरिरात केली जाते. आंब्यामधील अ जीवनसत्व जंतुनाशक तर क जीवनसत्व त्वचारोग त्वचारोगावर परीणामकारक आहे
आंब्यामध्ये व्हिटामीन C व व्हिटामीन B 9 (फोलेट) मोठ्या प्रमाणात आढळते. बाकी व्हिटामीन्स व मिनीरल अतीशय थोड्या प्रमाणात आढळतात. यापैकी सर्वात जास्त ज्यावर चर्चा नेहमी वाचण्यात किंवा ऐकण्यात येते ती म्हणजे आंब्यामधील व्हिटामीन A च्या बाबतीत. आंब्यात खूप मोठ्या प्रमाणात व्हिटामीन A नसते. आपल्या व्हिटामीन A च्या दैनंदीन गरजेच्या केवळ 7% अ जीवनसत्व आंब्यातून मिळते.
याव्यतिरिक्त आंब्यामध्ये आणखी कोणकोणती पोषक मुल्ये आहेत हे खालील सारणी मध्ये पहा.
Principle | Nutrient Value | Percentage of RDA |
Energy | 70 Kcal | 3.5% |
Carbohydrates | 17 g | 13% |
Protein | 0.5 g | 1% |
Total Fat | 0.27 g | 1% |
Cholesterol | 0 mg | 0% |
Dietary Fiber | 1.80 g | 4.5% |
Vitamins | ||
Folates | 14 µg | 3.5% |
Niacin | 0.584 mg | 3.5% |
Pantothenic acid | 0.160 mg | 1% |
Pyridoxine (vit B-6) | 0.134 mg | 10% |
Riboflavin | 0.057 mg | 4% |
Thiamin | 0.058 mg | 5% |
Vitamin C | 27.7 mg | 46% |
Vitamin A | 765 IU | 25.5% |
Vitamin E | 1.12 mg | 7.5% |
Vitamin K | 4.2 µg | 3.5% |
Electrolytes | ||
Sodium | 2 mg | 0% |
Potassium | 156 mg | 3% |
Minerals | ||
Calcium | 10 mg | 1% |
Copper | 0.110 mg | 12% |
Iron | 0.13 mg | 1.5% |
Magnesium | 9 mg | 2% |
Manganese | 0.027 mg | 1% |
Zinc | 0.04 mg | 0% |
Phyto-nutrients | ||
Carotene-ß | 445 µg | — |
Carotene-α | 17 µg | — |
Crypto-xanthin-ß | 11 µg | — |
Lutein-zeaxanthin | 0 µg | — |
Lycopene | 0 µg | — |
आता आपण समजुन घेऊयात की तुम्ही आंबे खाऊन स्वःतच्या आरोग्याशी कसे काय खेळता ते.
होय ! आपण सध्या जे आंबे खातो त्यामुळे आपण आपल्या शरीरात हानिकारक पदार्थ तर नाही ना टाकत? आणि नेमक हेच कारण आहे हापुस टाळण्याचे. हापुस आंबा पिकवण्यासाठी सर्रास कॅल्शियम कार्बाईडचा उपयोग केला जातो. कार्बाईड आणि त्याच्या अनुषंगाने येणारी रासायनिक घटक म्हणजे साक्षात कर्करोगासारख्या महान रोगाला आमंत्रण होय. कोणताही आंबा कार्बाईडने पिकवलेला आहे की नाही हे तपासुन पाहण्याचे आणि मग खरेदी करण्याचे तंत्र सर्वांनाच जमते असे नाही. किंबहुना हापुस शब्दा भोवतीचा जो ग्लॅमर आहे, त्यामुळे हापुस आंबा विकत घेणे म्हणजे एक टेम्पटेशनच होऊन जाते. अनेकांना हे माहित असते की हल्ली कार्बाईड ने आंबे पिकवले जातात, तरीही खातरजमा न करता लोक आंबे विकत घेऊन खातातच. याचे कारण असते की त्यांना वाटते, जाऊदे एवढ्या वेळेस किंवा एकदाच असे खाल्ल्याने फार काही बिघडणार नाही. म्हणजे निष्काळजीपणा. बर हा निष्काळजीपणा नुसता आपणासच नाही तर आपल्या कुटुंबियांना देखील भोगावा लागतो.
खालील व्हिडीयो मध्ये पहा कार्बाईड ने पिकवलेला आंबा कसा ओळखावा ते.
कार्बाईड ने पिकवलेला आंबा कसा ओळखावा याच्य विविध चाचण्या आहेत. पण आपण खरच त्या वापरुन आंबे खरेदी करतो का? अगदी भरोश्याच्या व्यापा-याकडुन देखील हापुस विकत घेणे धोकादायक असु शकते. कारण जर त्या व्यापा-याची स्वःतची आंब्याची बाग नसेल व तो उत्पादकांकडुन विकत घेत असेल तर तो देखील फसवला जाण्याची शक्यता खुपच जास्त आहे. मग अशा वेळी आपण काय आंबे खाणे सोडुन द्यावे का?
मी मुळातच शेतकरी कुटुंबातील असुन अजुनही शेती करतो. मुळशी तालुक्यातील जामगाव हे माझे गाव. माझ्या बालपणी आमच्या गावातील घरात, साधारणपणे मे महिन्याच्या मध्यावर पाडाला लागलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे उतरवले जायचे. मग त्यांची आढी लावली जायची. अशा आढ्या एका घरात अनेक असायच्या. आणि गावात जवळजवळ सगळ्याच घरांमध्ये आंब्याच्या आढ्या असायच्या. घरामध्ये प्रवेश केला की लगेच आंब्यांचा घमघमाट जाणवायचा. भौगोलिक परीस्थीतीनुसार पुर्णतः सेंद्रीय, नैसर्गिक पध्दतीने उगवलेले, पिकलेले हे आंबे चवीसोबतच विविध पोषक तत्वे देखील आपणास द्यायचे. कारण प्रत्येकाच्या शेतामध्ये बांधावर किमान दोन तीन आंब्याची झाडे तरी असायचीच. काही सार्वजनिक आंब्याची झाडे गावामध्ये असायची. एखादे शेत नांगरण्यासाठी पुर्वी बैलं आणि नांगराचा उपयोग केला जायचा. हे नांगरण्याचे काम करताना दुपारच्या वेळी थोडी विश्रांती याच आंब्याच्या झाडांच्या सावलीमध्ये केली जायची. वर्षभरात शेतकरी या झाडाखाली अनेकदा झोपायचा, जेवायचा, गप्पा मारायचा. त्यामुळे माणसांचे ह्या झाडांशी एक विशिष्ट असे नाते तयार झालेले असायचे. आपल्याकडील (स्थानिक) आंब्याच्या प्रजाती तरी किती होत्या. अनेक प्रकारचे आंबे असायचे. घुटक्या, गोटी, शेंद-या, नाकाड्या, रात्या, खोब-या,डगरी अशा वेगवेगळ्या नावांचे वेगवेगळे आंबे पुर्वी गावागावात होते. अगदीच काय पण शहरातदेखील आमराया होत्या. हेच आंबे पुर्वी गावागावातुन शहरामध्ये विक्रीसाठी यायचे.
सध्या नांगरणीचे काम ट्रॅक्टर करतात. शेतीचे यांत्रिकीकरण, व्यवसायिकरण आणि हापुस च्या अवाजवी कौतुकाने हे आंबे सध्या अडगळ आहे काय असे शेतक-यांस वाटु लागले तर त्यात नवल नाही. परीणामी अशा डेरेदार झांडांचे प्रमाण कमालीचे कमी झाले. शेतकरी स्वतःच शहरातील बाजारपेठेतुन हापुस विकत आणतो तर तो आता आढ्या कशा काय लावणार. असो.
तरीही कमी प्रमाणात का होईना, रायवळ आंबे बाजारात विक्री साठी योग्य वेळी उपलब्ध होतातच. तुम्ही पुण्याच्या आसपासच्या छोट्या बाजारपेठांमध्ये गेलात तर तुम्हाला गावरान म्हणजेच रायवळ आंबे अवश्य मिळतील. उदा – पिरंगुट, पौड, वडगाव मावळ, भोर, वेल्हा अशा ठिकाणी नक्कीच हे आंबे विकत मिळतील. यामध्ये खरेदीचे पर्याय देखील खुप जास्त असतात. आकार, गोडी, रंग इत्यादी नुसार किंमत ठरते. आणि कितीही महागातला आंबा आपण घेतला तरी तो हापुसच्या निम्म्यापेक्षाही कमी किमतीमध्ये मिळुन जाईल. हे रायवळ आंबे म्हणजे १००% खात्री. खात्री नैसगिक रीत्या पिकवलेले असण्याची, खात्री सेंद्रीय पध्दतीने उगवलेल्या व जगलेल्या आम्रवृक्षांची. खात्री उत्पादक शेतक-यास रोजगाराची. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खात्री अशी की रायवळ आंबे खाऊन कसलाही आजार होणार नाही याची.
हापुस अगदी घरचा किंवा नातेवाईकांच्या बागेतील असेल तर अवश्य घ्या. पण जर तसे नसेल तर हापुस आंबा न खाल्लेला बरा. हापुस ला समर्थ पर्याय आहे रायवळ म्हणजेच गावाकडचा आंबा.
तर मित्रांनो, आंबे खा, भरपुर खा पण हापुसचाच मोह मात्र टाळा.
Umesh Kulkarni
धन्यवाद महेश. अतिशय समयोचित आणि महत्वाच्या मुद्द्याला हात घातलास. हापुस आंबा म्हणजे पुण्याचा जीव की प्राण. तरीही सत्य सर्वांसमोर मांडण्याच धाडस केल तु. खुप छान आणि अतिशय सोप्या भाषेतला लेख आवडला.
Akshay
True